बटाट्याच्या चाळीत झुरळं नेहमीचीच. माणसं, झुरळं आणि बटाटे हे तीन जीव बघितले तर खोलीगणिक झुरळं सर्वाधिक, मग बटाटे आणि शेवटी माणसं अशी उतरती भाजणी होईल. अगदी तान्ह्या बाळानं तोंड वर करून आईकडे किंवा मान फिरवून बाबाकडे बघण्याआधी जिथे नजर जाईल तिथे हा सहा पायांचा प्राणी पाहिलेला असतो. त्यामुळे इथल्या कित्येक लहान मुलांच्या तोंडी पहिला उद्गार 'आई', 'बाबा', 'बटाटा' असा न येता "झुलल" असा येतो. (अनेक मुलांच्या मुखी पहिला घास म्हणूनही "झुलल" गेलेलं आहे.) इतकं कशाला, म्हाळसाकांत पोंबुर्पेकरानं एकदा "मन झुललं झुललं" अशी कविता केली असता एच. मंगेशरावांनी तिला बालगीताची चाल लावली होती! अर्थात पोंबुर्पेकर वाचला - बिचाऱ्याच्या तिरळेपणामुळे तो झुरळाकडेच बघतोय असा (त्याच्या 'तिच्या'सकट) सर्वांचा समज झाल्यामुळे.
चाळीत झुरळं, बटाटे आणि माणसं यांत खोलीचं भाडं कुणी भरायचं या विषयीही अलिखित समन्वय साधला गेला आहे. (तो भाडं कुणीच भरायचं नाही असा आहे - फक्त माणसांनी मध्ये-मध्ये ती इच्छा व्यक्त केली की झालं.) बटाटे फक्त नावाचे धनी. नामा धुळा बटाटे हे नाव सार्थ करत ते (कुकरमध्ये) उकडत पडण्याआधी धूळ खात कुठल्याश्या चाळणीत मोड येईपर्यंत (गरम हवेत) उकडत पहुडलेले असतात. ते बेडूक आणि राजा या गोष्टीतल्या धोंड्यासारखे - नाममात्र.
याउलट झुरळांची प्रजा आपणच राजा असल्याच्या थाटात सगळीकडे बागडत असते.
चाळकरी माणसं मात्र या राज्यात आपला दर्जा प्रजेपेक्षाही खुजा असल्याचं मान्य करून राहत असतात. कधी तरी कुणाच्या चपलेखाली एखाद्या झुरळाचं तन चिरडलं गेलं असेलही, पण रोज भरडलं जाण्याचं प्राक्तन मात्र माणसाचंच आहे याची चाळकऱ्यांना जाणीव आहे.
असं असूनही बटाट्याची चाळ राजकारणापासून कधीच दूर नसते. गांधीवादी आचार्य बाबा बर्वे ते ध्येयवादी बंडू यांच्यामुळे चाळीला वेळोवेळी अनेक झेंडे मिळाले आहेत. ते फडकावणाऱ्यांचा 'चाळीचा सिंह', 'चाळीचा वाघ', 'चाळीचा छावा' वगैरे पदवी देऊन गौरवही करण्यात आला आहे. मात्र 'चाळीचं झुरळ' अशी उपाधी देण्याचं धारिष्ट्य आत्तापर्यंत कुणी केलं नव्हतं इतकं वरचं स्थान झुरळांचं आहे.
अचानक कुणीतरी माणसांना झुरळाची उपमा द्यायची गोष्ट केली आणि चाळकऱ्यांचे डोळे खाडकन उघडले. (इतके की त्या उघड्या डोळ्यांनी आपल्या अंधाऱ्या खोलीत त्यांना आणखी काही झुरळांचं दर्शन घडलं.) पण या वर्षीच्या चाळ दिनाला 'चाळ झुरळ' हा खास पुरस्कार देण्याची मागणी करावी या विषयी 'कोअर कमिटी'ची बैठक झाली.
मुख्य मुद्दा हा होता की कुठल्या गुणासाठी हे पारितोषिक द्यायचं.
"झुरळ त्याचं डोकं गमावल्यावरही महिनाभर जिवंत राहतं," कोचरेकर मास्तर म्हणाले.
"मुरारबाजी फक्त काही क्षण जिवंत राहिला होता - पण लढला शौर्यानं - मुंडकं गेलं पण धड लढत होतं," इतिहासाचार्य बाबूकाका खरे यांनी माहिती पुरवली. त्यांना पुरंदरचं पुण्यस्मरण झालं. इथे मंडळी झुरळाला धुरंधरच्या जोडीला बसवत होती.
"झुरळ महिनाभर न खाता राहतं." कोचरेकर मास्तर म्हणाले, "वाघ-सिंहालाही हे शक्य होत नाही. झुरळ इतकं महान असतं!"
"साला तू यात बक्षीस कसला देणार?" त्रिलोकेकर भडकले, "उपास जो जास्त करेल त्याला? मग हा बर्वेच जिंकेल." आचार्य बाबां बर्वे यांना पारितोषिक मिळण्यापेक्षा आपल्याला उपास घडेल हा विचार करणं त्यांना जड जात होतं.
"झुरळ ताशी तीन मैल वेगानं चालतं. म्हणजे माणसाच्या चालण्यापेक्षा..."
"पण माणूस जर चालण्याऐवजी धावला तर एका तासात ... किती तरी जास्त पुढे जाईल," त्रिलोकेकर नक्की किती हे माहिती नसल्यामुळे फक्त अंदाजानं म्हणाले, "साला हे काही खरं नाही. अजून काही तरी वेगळा पॉईंट काढ."
"चीनमध्ये झुरळाचं लोणचं करतात. पण झुरळ खाल्लं तर पोट बिघडू शकतं." मास्तरांनी उरली सुरली माहिती दिली.
"मग आता काय तू बायकांची 'आचार स्पर्धा' ठेवणार काय?" त्रिलोकेकरांनी हा विचारही (अंगावरचं झुरळ झटकल्यासारखा) झटकून टाकला.
"गनिमी कावा! औरंगजेबानं शिवाजी महाराजांना 'पहाड का चुव्वा' म्हटलं होतं, पण खरं तर उंदीर म्हणण्यापेक्षा झुरळ ही उपमाच योग्य ठरली असती. त्यालाही बहुधा झुरळाची भीती वाटत असावी," बाबूकाका तेवढ्यात म्हणाले. औरंगजेब झुरळाला घाबरत असेल या कल्पना-विलासानं मंडळी जरा सुखावली.
"चाळीतला गनिमी कावा कसा सिद्ध करणार?" मास्तरांनी विचारलं. सोमण काका त्यांचं वर्तमानमात्र पेपरवाला दरवाजाच्या कडीला अडकवत असतानाच शिताफीनं पळवतात, नळाला आपली बादली पहिली लावण्यासाठी बायकांच्या शक्ती आणि युक्तीची जणू शर्यतच लागलेली असते आणि नव्या मालकाचा (हो, ते येईल पुढे) हस्तक भाडं वसूल करायला आला की चाळीत लपाछपीचा खेळ रंगतो हे गनिमी कावे दखलपात्र असले तरी खुले-आम बक्षीसपात्र आहेत का हा मुद्दा संभ्रमात टाकणारा होता.
"पण पुरस्कार कसला? उलट सगळ्याच झुरळांचा नायनाट केला पाहिजे," प्रा. नागूतात्या आढ्ये नेहमीप्रमाणे सर्वांपेक्षा वेगळी भूमिका घेऊन उतरले रिंगणात.
"झुरळांचा बंदोबस्त करणं हे मालकांच्या रेमिटमध्ये येतं." त्रिलोकेकरांचं रेमिट अनेकांना न कळल्यामुळे बाकीच्यांची तोंडं मिटली थोडा वेळ.
"आपण बरोबर बोललात, आपण फक्त झुरळं आणि माणसं या सहजीवनाबद्दल बोलू शकतो," आचार्य बोलते झाले, "मात्र आपले नवीन मालक आपण जर पुरस्कार द्यायचा ठरवला तर त्याच्या विरोधात नसतील. तो आपला प्रश्न आहे."
आपला प्रश्न आहे हे मान्य, पण उत्तर काय ते कुणीच देत नव्हतं अशा पेचात ही सभा काही न ठरताच बरखास्त झाली.
त्यातच अलीकडे बटाट्याच्या चाळीच्या मालकीत पुनः बदल झाला होता. मेंढे पाटलांनी चाळीतल्या अस्वस्थतेला (त्यांच्या भाषेत 'अस्वच्छतेला') कंटाळून ती एका पोपट नामक गुजराथी व्यावसायिकाला विकून टाकली होती.
पोपटभाईंनी चाळीत येऊन अतिशय प्रभावी भाषण केलं.
"मित्र हो", या शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात करून त्यांनी चाळकऱ्यांना खिशात टाकलं. पुढे म्हणाले, "आपण चाळीचा खरा विकास आता सुरू करणार आहोत. बटाटे आणि मेंढे पाटील यांच्यामुळे चाळ मागे पडली. आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे. चाळीत ज्ञानी लोकांची कमतरता नाही. इथे प्रत्येक जण चाळ-गुरू आहे. त्यांची आपण उपासना केली पाहिजे."
इथे त्रिलोकेकरांनी बाबांकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघितलं आणि बाबांनी "उपासना करणं म्हणजे उपास करणं नाही" असं हलक्या आवाजात त्यांना समजावताच त्यांचा चेहेरा खुलला.
पोपटभाई पुढे बोलतच होते,
"चाळ संस्कृती उच्च आहे. परदेशातून लोक आपली चाळ बघायला आले पाहिजेत. इंग्रजांनी दोनशे वर्षं भारतावर राज्य केलं. आपल्याला लुबाडलं. अगदी कोहिनूर पळवला. पण त्या देशात एक चाळ बसवता आली नाही. त्या लोकांना आपला हेवा वाटतो. वंदे चाळ, वंदे भारत!"
भरपूर टाळ्या आणि कौतुकाचे स्वर ऐकत त्यांनी मग घोषणा केली, "आपण "पोपट समृद्धी निधी" असा एक आपण फंड सुरू करणार आहोत. विकासात सर्वांचा सहभाग हवा." चाळीच्या चौकात एक दानपेटी लागली आणि चापशीकडे तिची किल्ली सुपूर्द करण्यात आली. अनेकांनी प्रश्न विचारायला हात वर केले, पण ते आपल्या अनुमोदनासाठी आहेत असा समज करून घेऊन आपलेही हात हलवत कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता पोपटभाई निघून गेले!
लोक भारावून गेले होते. जनोबा रेगेच्या "अरे पण ह्यांका बदल नक्की कसलो करुचो आसा?" या प्रश्नाला उत्तर कुणाकडेच नव्हतं. पण "गप रे मेल्या जनोबा, शंका काढू नकोस" यात सर्वांनी त्याला गप्प बसवलं आणि "वंदे चाळ"चे नारे (पोपटपंची?) चाळीत घुमू लागले. ध्येयवादी बंडू आणि त्याचे सुपुत्र यात आघाडीवर होते. विशेषतः वर्गणी गोळा करण्यात. शिवाय अतिशय सकारात्मक संदेश चाळीचा नोटीस बोर्ड ते व्हाट्सअप पर्यंत सगळीकडे पसरवण्यात. चाळीत नवीन काय होणार आहे यापेक्षा आधीच्या मालकांनी काय केलं नाही हे अस्वच्छ शब्दांत (अस्वस्थ नव्हे) सांगितलं जाऊ लागलं.
चापशीनं पोपटरावांनी पेस्ट कंट्रोलची योजना आणली आहे अशी बातमी आणली तेव्हा आता झुरळांचं काय होणार या विचारानं सर्व चाळकऱ्यांना दुःख झालं. इतक्या वर्षांची सोबत दुरावणार हा कसला विकास असा प्रश्न ते (बंडू आणि नागूतात्या सोडून) विचारू लागले. पोंबुर्पेकरानं "मन झुरंलं झुरंलं" अशी नवी साद घातली आणि एच मंगेशरावांनी त्या कवितेला सॅड चाल लावली. चाळदिनाला पुरस्कार देता आला नाही तरी निदान स्मरणातून झुरळ जिवंत रहावं उदात्त हेतूनं ते 'चाळ गीत' व्हावं अशी आचार्य बाबा बर्वे यांनी इच्छा व्यक्त केली.
दरम्यान पेस्ट कंट्रोलवाले चाळीत आले. तळ मजल्यावरील चापशीचं किराणा मालाचं दुकान, आत्मू माईणकराचं हॉटेल, हातवळणेचा दवाखाना आणि इतर दुकानांचं पेस्ट कंट्रोल करून निघून गेले. सगळ्या व्यावसायिकांनी पोपटभाईंची मोठमोठी रंगीबेरंगी चित्रं असलेली चाळीच्या विकासाची जाहिरात आपल्या दुकानाबाहेर लावली. त्यांवर झगमगीत दिवे लावल्यामुळे चाळ बाहेरून चमकू लागली.
चाळ दिनाचं या वर्षी "चाळ समृद्धी दिन" असं पोपट भाईंच्या संदेशाद्वारे नामकरण करण्यात आलं. पोंबुर्पेकर "चाळ झुरळ" या किताबाचा पहिला मानकरी ठरला. "मन की बात" ओळखणारा मालक भेटला म्हणून चाळकरी आनंदले.
आत्मू माईणकराच्या पदार्थांना पूर्वीची चव राहिली नाही एवढा एक बदल सोडला तर वर राहत असलेल्या चाळकऱ्यांसाठी काहीच बदललं नव्हतं. झुरळ, बटाटे आणि माणसं यांचं समीकरण (आणि त्यांच्या स्तरांतलं विषमीकरण) पूर्ववतच होतं...
- कुमार जावडेकर