Friday 22 March 2024

बाँड आणि बांध

विडंबन (बाँड):

बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'

शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे

रेखतो भक्तांत मी प्रतिमा स्वत:ची
भोवती माझ्या मतांचा प्रलय आहे

- 'सुमार' जावडेकर

बांध (मूळ गझल) -

बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे'

वादळाची का तमा मी बाळगावी?
आज झाले पत्थराचे हृदय आहे

मांडतो शब्दांत मी दु:खे जगाची
भोवती माझ्या सुरांचे वलय आहे

- कुमार जावडेकर

Sunday 25 February 2024

सांज असते

अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते

जुना तोच शृंगार लेवून उसना
समारंभ फिरुनी नवा सांज असते

जरी रात्र असते तुझी दाट छाया
छटांचा तुझ्या कारवा सांज असते

दिशाहीन क्षितिजे पुनः फेर धरता 
पुनः जीवनी नाखवा सांज असते

तुझा गाव गेला जरी दूर मागे
मनी सुखद तो गारवा सांज असते

न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते

- कुमार जावडेकर 

Wednesday 4 October 2023

संगीत प्र(या)वास

अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच हा मित्र त्याचं ते आडनाव नसलं तरी माझ्यावर खार खायचा.

पुलंनी, त्यांच्या बिगरी ते मॅट्रिक प्रवासाला 'खडतर' सोडून दुसरं कुठलंच विशेषण त्यांना सुचत नाही असं म्हटलं होतं... माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. 

प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले. लगेच "मी 'असुर' आहे" असा विनोद केला तर तो फार बाळबोध ठरेल असं मला वाटतं. (तसं एकदा बाळासाहेब ठाकऱ्यांनी लता मंगेशकरच्या 'शिवउद्योगसेने'साठी केलेल्या कार्यक्रमात म्हटलं होतं असं आठवतंय. त्यांना ते शोभून दिसलं होतं.)

सूर गवसण्याआधी 'सूर किती असतात?' हा प्रश्नच अनेक वेळा भाव खाऊन गेलेला मला आठवतोय. माझ्या गाण्याच्या पहिल्या 'क्लासा'त (माझं गाणं आणि क्लास या शब्दाचा आलेला हा एकमेव संबंध) मला (आणि इतरांना)  वीस-तीस वेळा 'सा रे ग म प ध नि सां' घोकायला लावल्यावर आमच्या शिक्षकांनी विचारलं होतं -

'सांगा - सूर किती?'

माझी लगेच हात वर करायची सवय मला नडली होती. मी 'आठ' म्हटल्यावर माझं उत्तर कसं चुकीचं आहे, वरचा 'सां' हा खालचाच 'सा' कसा 'वर' म्हटलेला आहे आणि त्यामुळे सूर सातच आहेत, वगैरे गोष्टींची माझ्या ज्ञानात भर पडली होती.

यानंतर काही वर्षांनी आम्ही घर (आणि संगीत विद्यालय - 'क्लास' नको) बदलल्यावर पुन: नवीन ठिकाणी 'सा रे ग म...' घोकायला लागलो होतो. पुन: शिक्षकांनी हाच प्रश्न विचारला होता.

'सात' या माझ्या उत्तराला ते फक्त हसले होते. 'बारा' या उत्तरात कसे सगळे एका आवर्तनातले कोमल, शुद्ध आणि तीव्र स्वर येतात आणि त्यामुळे तेच उत्तर कसं बरोबर आहे हे मला आता कळलं होतं.

थोडक्यात, संगीतात आपली काही प्रॉपर्टी करायची असेल तर या सात-बाराचा हा (चढ-) उताराच कामी येईल अशी माझी धारणा या गुरुजनांनी करून दिली होती. अर्थात, साध्या प्रॉपर्टीसाठी कर्ज मिळतं. इथे खर्जापासून वर सगळं मुद्दल आपल्यालाच उभं करायला लागतं हा एक दोघांतला मोठा फरक.

शास्त्रीय संगीतापासून सुरुवात करुया. त्याच्या गतीचा 'अगतिक' या शब्दाशी काही संबंध नाही, हेही मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. खरं तर असे अनेक खुलासे करणं भाग आहे. 

माझ्या दृष्टीनं काही शास्त्रीय विधानं: 

१. मला शास्त्रीय संगीत आवडतं.

२. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि कळतंही.

३. मला शास्त्रीय संगीत आवडतं, कळतं आणि शिवाय त्याविषयी बोलायलाही आवडतं.

४. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि (कळत नसलं तरी) त्याविषयी बोलायला आवडतं.

माझ्या दृष्टीनं काही अशास्त्रीय विधानं:

१. मला शास्त्रीय संगीत आवडतं. इतर संगीत अशास्त्रीय आहे आणि/अथवा अमानुष आहे.

२. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि कळतंही. ज्यांना ते कळत नाही त्यांची करायचीच तर फक्त कीव करावी.

३. मला शास्त्रीय संगीत आवडतं, कळतं, आणि शिवाय त्याविषयी बोलायलाही आवडतं. मी किती उच्च आहे हे त्यावरून सिद्ध होतं.

४. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि (कळत नसलं तरी) त्याविषयी बोलायला आवडतं. मी किती उच्च आहे हे त्यावरून सिद्ध होतं. 

वास्तविक वर दिलेल्या विधानांमधे 'कळणं' ह्या ठिकाणी 'कळतंय असा समज असणं' अशीही एक उपश्रेणी टाकायला हवी. एकंदरित या विधानांमधे शास्त्रीय संगीत याऐवजी वारुणी ('तू वाइन पीत नाहीस? कंबख्त तू ने तो ...'), गाडी ('अरे जर्मन गाड्या म्हणजे...'), मोबाइल फोन ('आय-फोनची सर...') अशा अनेक गोष्टी घालता येतील. मला शास्त्रीय संगीतापासून प्राप्त झालेलं सगळ्यांत महत्त्वाचं ज्ञान हे की आपल्याला काय येतंय हे दाखवण्यापेक्षा आपण ज्याच्याशी बोलतोय त्याला (किंवा तिलाही) काय येत नाही हे दाखवणं आत्मसात करावं. एखादा गायक 'गोरख कल्याण' म्हणायला लागला तर 'जसराजांचा ऐकलाय का?' असं विचारायचं. बागेश्री म्हणायला लागला तर 'आमिर खान' यांनी 'बागेश्री' 'कानडा' अंगानं म्हटला होता असं म्हणून त्याला नडायचं. कुणी 'येरी आली पिया बिन' म्हटलं तर किशोरी आमोणकरांनी किती वेगळं पेश केलंय हे सांगून त्याला घेरी आणवायची. 'कोमल ऋषभ आसावरी तोडी' या रागाचा संपूर्ण उल्लेख करणं म्हणजे अगदीच शाळकरी. त्याला 'कोमल ऋषभ आसावरी', 'कोमल ऋषभ' (वास्तविक हा स्वर आहे) किंवा अगदी 'कोमल' हे श्रोता बघून (?!) संबोधता यायला हवं. मात्र मतमांडणी अगदी आटोपशीर असावी. अलीकडेच एकदा कुणी तरी विचारलं, 'कौशिकी चक्रवर्तीबद्दल काय मत आहे तुमचं?' - 'अगदीच नवशिकी आहे नाही?' मी इतकंच उत्तरलो. आता तो शोधत बसलाय तिला नवशिकी म्हणणाऱ्या मला किती ज्ञान आहे ते.

थोडक्यात, असं केलं म्हणजे आपली सरशी होते. अगदी नाहीच झाली, तरी 'ऐकणाऱ्याची लायकीच नव्हती' हे म्हणायला आपण मोकळे! कारण आपला विषयच महान असतो.

वास्तविक ही विधानं (पहिली चार - 'शास्त्रीय') माझ्या लेखी - कुठल्याही बाबतीत - मग ते मासे असोत की वांगं, क्रिकेट असो की कबड्डी (केवळ गोल्फ किंवा स्नूकर असायची गरज नाही) - लागू पडायला हवीत. संगीताबद्दलच म्हणायचं झालं तर कुठल्याही प्रकारच्या संगीताला (मग ते एकविसाव्या शतकातलं 'बॉलिवूड'चं असो की एकोणिसाव्या शतकातलं नाट्यसंगीत असो) समाविष्ट करणारी असावीत. पण तसं होत नाही, हे खरं.

शिवाय शास्त्रीय संगीतात भ्रमण करण्यासाठी - मग ते श्रोता म्हणून जरी असलं तरी - आपल्याला एक अतिप्रचंड शब्दकोशच शिकायला लागतो. राग किंवा तालांची नावं जाऊ देत. मी फक्त बाकीच्याच शब्दांबद्दल बोलतोय. त्यांची तुलना मला लग्न या आयुष्यातल्या घटनेच्या वेळी जे शब्द आत्मसात करायला लागतात त्यांच्याशीच करता येईल असं वाटतं. एक समजा 'ब' हे अक्षर घेतलं, तर बस्ता, बायको, बाशिंग, बिदाई, बोहला असे अनेक शब्द प्रथम अनुभवायला मिळतात. दुसरं एखादं - समजा - 'म' हे अक्षर घेतलं, तर मधुचंद्र, मानपान, मिरवणे, मंगळाष्टक, मंगळ, मंगळसूत्र, मुंडावळ्या असे अनेक शब्द आपल्या पदरी पडू शकतात. हे शब्द मी बाराखडीच्या क्रमानं (ब/बा/बि/बी...इ. किंवा म/मा/मि/मी... इ.) लिहिले आहेत, घटनाक्रमानं नाहीत, हे अजून एक स्पष्टीकरण. मिरवणूक जरी इतरत्र निघत असली (उदा. गणपतीची, नेत्याची) तरी मिरवण्यासाठी लग्नच (शक्यतो दुसऱ्याचं) हवं. याव्यतिरिक्त अंतरपाट, करवली, केळवण, रुखवत, सप्तपदी, हुंडा असे कित्येक शब्द, आणि 'स्थळ सांगून येणे', 'सूप वाजणे', असे अनेक वाक्प्रचार आपल्याला आत्मसात करायला मिळतात. एवढं झालं तरच लग्नसोहळा ही काय चीज आहे हे कळू शकतं. 

'लग्नाच्या साड्या घेतल्या का?' असं म्हणणं चुकीचं आहे, तिथे 'बस्ता'च हवा. तसंच शास्त्रीय संगीतात. इथे 'काल गायकानं कोणतं गाणं म्हटलं?' हा प्रश्न चुकीचा ठरतो. 'काल बुवांनी कोणती बंदिश म्हटली?' असंच म्हणायला हवं. चिज, गत (ही आपली होणारी अवस्था नसते) हे शब्द अवगत नसले तर इथे काम महाकठिण.

मला घराणी ओळखता येत नाहीत. 'किराणा' घराणं हे मारवाड्यांचं असतं अशी माझी लहानपणीच पक्की समजूत झाली होती. ते शास्त्रीय संगीतातल्या घराण्याचं नाव आहे असं कळल्यावर 'गेला बाजार आता भेंडीबाजार हेही कुणी घराण्याचं नाव म्हणेल' असं मी म्हटलं होतं. त्यावर 'आहेच मुळी!' असं उत्तरही मिळालं होतं! शिवाय लता मंगेशकर याच घराण्याची आहे हेही कळलं होतं. गुलाम अली पतियाळा घराण्याचे आहेत हे पुढे माझ्या माहितीत जमा झालं आणि शास्त्रीय संगीताचं आणि सध्याच्या भूगोलाचं फारसं बरं नसावं हे लक्षात आलं. ग्वाल्हेर घराणं शिंद्यांचं आणि इंदूर घराणं होळकरांचं असं इतिहासात वाचलं होतं. त्यातून मग संगीताचा आणि इतिहासाचाही काही संबंध नसतो असं मी अनुमान काढलं. ..आणि त्यावर 'शास्त्रीय संगीताइतकं पारंपरिक आणि अभिजात दुसरं काही नाहीये' असं ऐकून घेतलं. मी या अशा शब्दांना जाम घाबरतो. हे असे शब्द आले, की त्यापुढे लगेच त्या सगळ्यांचा संस्कृतीशी संबंध लावला जातो. मग तिच्या रक्षणाची जबाबदारी आपण कशी घेत नाही हे स्पष्ट केलं जातं. 

मला राग येत नाही, असं नाही. (इथे मी परिच्छेद बदलला आहे. यावरून या रागाचा संस्कृतीरक्षणाशी संबंध नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल.. .की आहे? ) 

शालेय अभ्यासक्रमाच्या जोडीनं छंद म्हणून शिकायच्या(!) काही गोष्टी आपल्या नशिबात येतात. पोहणे, गाण्याचा क्लास लावणे इत्यादी. (माझ्या गाण्याचा आणि क्लास या शब्दाचा संबंध एवढाच काय तो आला.) पण त्या क्लासात मी काही लक्षणगीतं आणि चिजा शिकलो होतो. ओडव, षाडव वगैरे शब्दांनी डोक्यात तांडव केलं होतं. सम, काल (किंवा खाली - मग सम 'वर' का नाही?) या शब्दांपासून पलटे, आलाप, ताना, बोलताना, गत (हा  शब्द पुन: आला - तो आपली अवस्था दर्शविणारा नाहीये) अशा अनेक गोष्टी अवगत व्हायला हव्यात, तरच आपली धडगत आहे हे कळून चुकलं.

शिवाय, रागांची नावं हा तर अचाट प्रकार आहे. 'मधमाद सारंग' असं नाव असलेल्या रागात 'ध' वर्ज्य असतो हे शिकताना मला धक्का बसला होता. मग त्याला म आणि ध या दोन्हींचा माद का म्हणायचं असा माझा प्रश्न होता. कुणीतरी मध्येच रागातल्या 'ध' चा 'म' करून नाव बदलण्याआधीच गारद झाला असेल आणि बाकीचे विशारद तसंच गात बसले असतील, असं त्यावर मग मी संशोधनही केलं होतं! सारंगच्या शुद्धीकरणात 'ध'ची भर घालण्याचं महत्कार्य पूर्वीच झालेलं आहे हे मला मागाहून कळलं. बागेश्री आणि भीमपलास अशी नावं असलेल्या रागांचे सूर सारखेच असतात (फक्त चलन वेगळं असतं) हेही त्याच काळातलं अध्ययन. एकंदरित काय, संगीत आणि जीवन या दोन्हींत, चलन जास्त महत्त्वाचं हा उपयुक्त धडा मात्र मला या प्रसंगांतून मिळाला होता.

बागेश्रीला रागेश्री नावाची एक जुळी बहीण आहे. बागेश्रीतल्या कोमल 'ग'चा रागेश्रीत शुद्ध 'ग' होतो. दोघी निशाचर. एक नुसताच श्री नावाचाही राग आहे. पण या नुसत्याच श्रीचे स्वर खूपच निराळे. तो संध्याकाळचा गंभीर राग. त्यामुळे राग पटकन ओळखता नाही आला तर 'कुठला तरी श्री' असेल असं सांगायची सोय नाही. बागेश्री आणि रागेश्रीत माझा नेहमी गोंधळ व्हायचा. बागेश्रीतली 'कौन करत तोरी बिनती पियरवा' ही चिज आणि रागेश्रीतलं 'कौन आया मेरे मन के द्वारे' हे गीत यांनी माझ्या चंचल बालमनात फारच चलबिचल केली होती. बरं दोन्ही गाण्यांचा अर्थही पूर्ण निराळा. एकात 'पिया'ची बोळवण तर दुसऱ्यात प्रियेची आळवणी!

मात्र कंसातल्या रागांचं असं नसतं. तिथे 'कंस अंगाचा राग आहे' हे वाक्य टाकायला मुभा असते. मग त्या कंसांत माल, मधु, चंद्र, गुण दडपता येतात. एवढंच नाही तर हरि, जय इत्यादी नावं आणि जोग वगैरे आडनावंसुद्धा!

किशोरकुमारनं (आणि अन्नू मलिकनंही) संगीताचं शिक्षणच घेतलं नव्हतं अशी चर्चा अनेकदा होत असते. इतकी की असं काही शिक्षण न घेताच गाणं आलं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. आता संगीत न येता 'भोले नीचे से' असं तो सुनील दत्तला 'पडोसन'मध्ये कसं म्हणू शकला (पेटीवर सारेगम शिकवत असताना) आणि 'कोई हमदम ना रहा' हे झिंझोटीतल्या एका सुंदर चिजेवर आधारित गाणं कसं संगीतबद्ध करू शकला ही कोडी मला कायम पडत असत (अजूनही पडतात). त्याला राग येत नसेल कदाचित, पण संगीत नक्कीच येत होतं हे माझं अनुमान मात्र अजून अनेकांना पटलं नाहीये. एखादं ज्ञान उमजत नसलं की ते उपजत असतं असं म्हणायचं मी यातूनच शिकलो. त्यामुळे जगात मात्र आपली सोय होते फार. 'मला स्वयंपाकातलं काही कळत नाही, ते ज्ञान उपजतच असावं लागतं', 'मला कुठलाही खेळ येत नाही कारण माझ्या जीन्समधेच तो नाहीये' वगैरे वाक्यं आपल्याला आरामात टाकता येतात. या सगळ्यातून झालेलं सर्वांत मोठं ज्ञानार्जन म्हणजे, 'मला संगीतातलं कळतं' आणि 'मला संगीतातलं काही कळत नाही' या दोन्ही वाक्यांना जगात सारखाच मान आहे या गोष्टीची जाणीव. फक्त कोणतं वाक्य कोणासमोर बोलायचं एवढे उपचार समजले की 'उरलो उपकारापुरता' ह्या नीतीनं फक्त गाण्याचा निर्भेळ आनंद घेता येतो!

हा साक्षात्कार झाला आणि तो सांगावासा वाटला म्हणून हे प्रयोजन. 

आता माझं ऐकायचं आणि बोलायचं संगीत मी वेगळं केलंय...!  

- कुमार जावडेकर

Sunday 14 February 2021

गुमोसोस आणि अफ़सोस

 आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत. तसा त्यांच्याकडे इतके दिवस स्वतःचा लॅपटॉप होताच, पण त्यांच्या पंच्याहत्तरीला त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना एक सुंदर 'स्मार्ट फोन' आणून दिला आणि मामांनी अक्षरश: कात टाकली. धडाधड 'गुमोसोएक' (गुलमोहर सोसायटी एक्जिक्युटिव्ह कमिटी), 'गुमोसोस' (गुलमोहर सोसायटी सभासद) अशी दोन मंडळं तयार झाली. काही दिवसांतच बायकांनी आपलं एक वेगळं मंडळ तयार केलं. त्याचं नाव रोज बदलत होतं. 'गुल-शान' (आपण गुलमोहर सोसायटीची 'शान' आहोत असं अभिप्रेत असावं), 'गुल-फाम' (याची फोड माहिती नाही, बहुधा फेमस या शब्दाशी काहीतरी संबंध असावा) अशी अनेक नावं आली आणि गेली. या नावांचा आपल्या संकृतीशी (म्हणजे धर्माशी असंही काहींनी स्पष्ट केलं) संबंध दिसून येत नाही असं काही बायकांचं म्हणणं होतं. 'गुल-मोह' असंही एक नाव आलं होतं, पण त्या मोहात न पडता शेवटी 'गुलु-गुलू' या नावावर सगळ्यांचं एकमत झालं.

एकदा मंडळं तयार झाल्यावर मग मात्र कुणी मागे वळून पाहिलं नाही. मामा सभासदांना लागणारी सगळी माहिती, कमिटीचे निर्णय, बिलं, त्यांचे तगादे इ. सगळ्या गोष्टी एका नव्या जोमानं आम्हांला पाठवायला लागले. भुजबळांकडून रोज सकाळी न चुकता 'सुप्रभात' (रोज नवीन चित्र आणि संदेशासकट) चा निरोप येऊ लागला. शर्मानं रोज किमान दहा विनोद पाठवले नाहीत तर लोकांचा दिवस आनंदात जाणार नाही अशी आपली समजूत करून घेतली. नवीनच पहिल्या मजल्यावर राहायला आलेल्या उमेश आणि उमा या जोडप्यानं प्रत्येकाच्या वाढदिवसाला आपल्याकडून शुभेच्छा सर्वांच्या आधी गेल्या नाहीत तर आपली खैर होणार नाही अशी उगाचच आपली भावना करून घेतली. याशिवाय उमा प्रत्येक संकष्टी, एकादशी, शिवरात्र इत्यादींची आगाऊ माहिती द्यायला लागली. दोशी शेअर मार्केटमध्ये काय होणार याची भाकितं सांगू लागला आणि चाफेकर (जन्मगाव आणि शिक्षण पुणे) ट्रंप पासून किम पर्यंत कुठे काय खुट्ट होतंय हे कळवू लागला. याशिवाय मोदी, क्रिकेट, बॉलिवूड इत्यादी जिव्हाळ्याचे विषय... जो जे वांछील तो ते लिहायला (किंवा दुसऱ्यांनी लिहिलेलं पुढे सारायला) लागला.

अर्थातच, या सगळ्या विषयांवर चर्चा करताना एखाद्याच्या नाकी नऊ आले असते. पण आमच्या सभासदांचा उत्साह अफाट! त्यातून मुंबईत कितीही गर्दी भासली तरी अजूनही त्यात सहज सामील होते हे सिद्ध झालेलं आहेच, तेच ‘व्हॉटस ॲप’च्या बाबतीत झालं. अगदी येता-जाता आम्ही एकमेकांना 'आज चतुर्थी आहे? अरे, मी उमानं लिहिलं होतं तरी कसं विसरलो?', 'आजचा शर्माचा विनोद वाचलात?' किंवा 'फक्त ‘व्हॉटस ॲप’वरच नको, प्रत्यक्षात पण केक मिळू दे की तुमच्या प्रकटदिनाचा' असं म्हणायला लागलो.

मला 'व्हॉटस ॲप’वर असं कार्यरत असणाऱ्यांचा मनापासून आदर वाटतो. 'मी तीस मंडळांमध्ये आहे आणि मला प्रत्येक ठिकाणी रोज पन्नास निरोप येतात' असं सांगणारे स्वतः त्यातले तीस-चाळीस विनोद/लेख/कविता/बातम्या पुढे पाठवून इतरांच्या ज्ञानात किंवा आनंदात भर घालण्यासाठी वेळात वेळ काढतात हे खरंच कौतुकास्पद आहे.

"कसा काय वेळ मिळतो बुवा लोकांना वाचायला?" असं एकदा मी मामांना विचारलं होतं.

"अहो, मला तर आनंद होतो. या वयातही आपल्याला इतके लोक संपर्क करतायत. आपल्यावाचून त्यांचं अडतंय असं उगाच वाटतं किंवा निदान वाटवून घ्यायला तरी मिळतं! आपण किती महत्त्वाचे आहोत या सर्वांसाठी, हे कळतं."

मामांचा सगळ्यांना इमोजी किंवा प्रतिसाद देण्यात पहिला क्रमांक असायचा. फक्त सेवानिवृत्ती हे एकच त्याचं कारण नाहीये याची त्यांनी मला या संभाषणातून जाणीव करून दिली होती. 

अर्थात, या निरोपांत कधी कधी रुसवे-फुगवे, हेवे-दावे हेही आलेच. पण सुदैवानं 'आता माझी सटकली' म्हणून कुणी मंडळं सोडली नाहीत. कुणाची मनधरणी करायला लागली नाही. असंच पुढे चालू राहील असं वाटत होतं आणि वॅलेंटाईन डे आला. 

प्रेमाचं प्रतीक असलेल्या या दिवसाचं निमित्त साधून एकाच दिवशी एकच गोष्ट तिन्ही मंडळांवर - एकदा हिंदीत आणि दोन वेळा मराठीत (आणि प्रत्येकाच्या अनेक इतर मंडळांमधे त्यांच्या त्यांच्या भाषेत) आली...

"वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले, 'प्रेमाचे प्रतीक कोणते?' 

सगळ्या मुलांनी (एक सोडून) 'ताजमहाल' हे उत्तर दिले. फक्त गण्या म्हणाला, 'रामसेतू'.

शिक्षकांनी विचारले, 'का?'

गण्या म्हणाला, 'बायकोच्या नावाने ताजमहाल बांधून झाल्यावर शहाजहान बादशाहाने त्या कामगारांचे हात तोडले. या उलट बायकोला आणण्यासाठी पूल बांधणाऱ्या वानरांचा रामाने सन्मान करून त्यांच्याशी प्रेमाचे नाते जोडले.'

असे इतिहास आणि पुराणाकडे आपण नवीन दृष्टीने बघायला हवे."

"गण्या, तोडलंस मित्रा, " असं एक वाक्य माझ्या मनात गुप्तपणे (की 'गुप्तें'प्रमाणे?) उगाचच जुळून गेलं. पण ते खोडून मी असा विचार केला की आपल्याला अलीकडेच चाळिशी लागल्यामुळे आपण या नवीन दृष्टीनं ही गोष्ट वाचायला हवी. कधी नव्हे ते मी (मामांना स्मरून आणि आपण फार महत्त्वाचे आहोत असं समजून) आमच्या मंडळात लिहिलं,

'पण नंतर रामानं आपल्या बायकोला सोडलं त्याचं काय?' 

शेवटी स्माइली टाकला की तो विनोद होतो या माझ्या भ्रमाचा भोपळा लगेचच फुटला. 

वास्तविक आमची सोसायटी तशी पुरोगामी. 'हॅपी वॅलंटाईन डे' आणि 'मातृ-पितृदिनाच्या शुभेच्छां'च्या निरोपांची मंडळांवर एकत्र देव-घेव झाली होती. काही विनोदही येऊन गेले होते. पण या एका वाक्यावरून आमच्याकडे जे रामायण घडलं ते जर रामानं वाचलं असतं तर बहुधा सीतेला रावणाकडूनच नाही तर पुढे वाल्मिकींकडूनही परत आणलं असतं असं मला वाटायला लागलं!

नमुन्यादाखल काही प्रतिक्रिया - 

'वाह ताज' असं म्हणायचंय का तुम्हांला? तुमचा खरा पक्ष कळला.' (भुजबळ, रागावलेल्या इमोजीसकट, शिवाय सोबत एक हिरवा आणि एक पाकिस्तानचा झेंडा. त्यांना बहुधा 'तुमचा खरा देश कळला' हे अभिप्रेत होतं.)

'यात परकीय शक्तींचा हात आहे, आपल्या लोकांना ते असेच फितवतात.' (उमा... चक्क चपला, हाय हिल्स. ती घालते तशाच.)

'आपल्या लोकांतच एकी नसते.' (उमेश, दोन रागावलेले इमोजी. उमेश त्या मानानं शांत स्वभावाचा आहे.)

'असं नुसतं चालणार नाही, शब्द मागे घ्या. आपणच जर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला नाही आणि तिचा प्रचार केला नाही तर ती शिल्लकच राहणार नाही.' (चाफेकर, पाच ठेंगे, पाताळाच्या दिशेनं.)

'प्रभु राम की और शहाजहान की कोई तुलना हो ही नही सकती. भगवान जो भी करते हैं वो सही होता है. उसके पीछे उनका क्या कारन है वो समझनें की भी हमारी योग्यता नहीं है. ' (शर्मा, तीन नमस्कार - हे बहुधा रामाला आणि सहा रागावलेले इमोजी - त्यातले तीन शहाजहानसाठी आणि तीन माझ्यासाठी असावेत.)

'हे राम. ' (दोशी, दहा नमस्कार आणि दहा रागीट तोंडं - ह्यानं माझा रावणच करून टाकला. फक्त त्यापुढे एक धनुष्य-बाण घालायला हवा होता.)

सकाळी निघताना मी हा निरोप टाकला होता. संध्याकाळी आपली धडगत नाही हे माझ्या लक्षात आलं. मी 'गंमत केली, कुणाच्याही भावना दुखावायचा माझा हेतू नव्हता' असं लिहावं का असा विचार करायला लागलो. पण अचानक बघितलं तर मामांचा मला व्यक्तिगत निरोप- 

'उत्तर देऊ नका आणि यापुढचे कुणाचे निरोपही बघू नका.'

मी 'ठीक आहे' असं उत्तर दिलं. घरीही उशिराच परतलो, रात्रीचे आठ वाजायला आले होते. ऑफिसात आणि परतीच्या प्रवासात, आपण आधी नीट विचार का नाही केला अशी दूषणं स्वतःला देत होतो. आता पुढे काय होईल याची वेगवेगळ्या प्रकारे कल्पना करत होतो. 

अखेर सोसायटीच्या कमानीतून आत आलो तेव्हा आमच्या इमारतीखालच्या अंगणातच घोळका (चक्रव्यूह?) करून असलेले आमचे सभासद मला दिसले. त्यांना सामोरं जाणंच भाग आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हळू हळू पुढे सरकलो. मामांनी माझी उजवी बाजू सांभाळली होती; पण डावीकडून भुजबळ, शर्मा, दोशी, चाफेकर, उमेश आणि उमा असं पूर्ण वर्तुळ (वाटोळं?) होतं.

मी जमलेल्या जमावात आपला शिरकाव करून घेतला. पहिल्या वाराला सिद्ध झालो.

अचानक, माझ्या खांद्यावर भुजबळांचा हात पडला.

"सॉरी."

आपण बरोबरच ऐकतोय ना असं वाटून मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.

"हो, आम्ही जास्तच वाईट लिहिलं तुम्हांला." उमानं थोडं स्पष्टीकरण दिलं.

"म्हणजे... " मी बोलायचा प्रयत्न केला. ('थोडंसं वाईट चाललं असतं का?' माझ्या मनात प्रश्न. पण इथे मी उत्तरं देण्यासाठी उभा असणं आवश्यक होतं.)

"टेन्शन मत लो," शर्माचं प्राज्ञ हिंदी एकदम मुन्नाभाईच्या वळणावर गेलं.

"अरे, पण मला कोणी काही सांगेल का? मी तर अगदी घाबरूनच गेलो होतो. तुम्ही काही म्हणा, पण आधी मीच तुम्हांला.... "

"चालायचंच," चाफेकरनंही मला मध्येच तोडलं.

शेवटी मामा म्हणाले, "चला, रात्र झाली आहेच, घरी जाऊ. " सगळे एकमेकांना पुनः एकदा 'हॅपी व्हॅलंटाईन डे' म्हणून आपापल्या फ्लॅटकडे निघालो. मामा आणि मी सगळ्यांत वरच्या मजल्यावर राहतो. वर पोहोचताच मी मामांना विचारलं,

"हा चमत्कार कसा झाला?" 

मामा हसून म्हणाले,

"विनीतमुळे झाला. ‘व्हॉटस ॲप’वर बघा. " 

विनीत - मामांचा नातू - तर आता इंग्लंडमध्ये असतो हे मला माहिती होतं. त्यानं इतक्या लांबून इतक्या थोड्या वेळात काय केलं असेल, असा विचार करत मी दार उघडलं आणि घरात शिरल्यावर फोनमध्ये डोकं खुपसलं. 

मामांनी अनेक यूट्यूब व्हिडिओज आमच्या सभासदांसाठी पाठवले होते. सगळ्या कार्यक्रमांचा विषय मात्र एकच होता - 'हॉरिबल हिस्टरीज'. प्रत्येक व्हिडिओनंतर मामांनी एकच वाक्य थोड्या-फार फरकानं लिहिलं होतं.

"राणी व्हिक्टोरिया, राणी एलिझाबेथ यांच्यापासून चर्चिल, शेक्सपिअरपर्यंत निदान त्यांच्या देशाच्या आणि भाषेच्या दृष्टीनं तरी आदरणीय, पूजनीय असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याकडे ते गंमतीनं बघू शकतात, त्यांची खिल्ली उडवू शकतात आणि त्यावर हसू शकतात, तर आपण का असं करू शकत नाही? एखाद्या गोष्टीतला विरोधाभास दाखवून देणं हा गुन्हा आहे का?"

अर्थात, एवढ्याशा शिकवणीमुळे लगेच मतपरिवर्तन होईल हे पटणं अवघड होतं. लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच होत्या. 

"राम देव होता, ह्या सगळ्यांमध्ये कुठे देव आहे? "

"ब्रिटिश राण्यांपासून ते चर्चिलपर्यंत राज्यकर्ते क्रूरच होते. त्यांना फक्त जगावर सत्ताच चालवायची होती. "

"आपल्याकडे असं चालणार नाही. आपण फक्त हिंदू-देवतांवर टीका सहन करून घेतो. इतरांवर नाही."

मामांनी सगळं ऐकून घेऊन एकच वाक्य लिहिलं होतं. "एक निदा फाजलींचा शेर फक्त आता लिहितो -

'घर से मस्जिद है बहोत दूर चलो यूं कर ले

किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए'..."

यापुढे कुणाचीच प्रतिक्रिया नव्हती.

मी मामांना फोन लावला आणि म्हटलं,

"तुम्ही सांगितलंत खरं इतकं, पण म्हणून सगळ्यांना पटलंय - मतपरिवर्तन नाही, पण दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याइतपत तरी - असं वाटतं तुम्हांला? "

"अजिबात नाही. पण आपल्या मंडळावर मी मला जे पटतं ते लिहिलं आहे. यानंतर मी इतरांना संध्याकाळी भेटल्यावर काय सांगितलं ते तुम्हांला कुठे माहिती आहे? "

"काय सांगितलंत? "

"तुम्हांला पश्चात्ताप झालाय तुमच्या वागण्याचा. तुम्ही खूप उशिरा परत येणार आहात. तुमच्यावर अजिबात रागवायचं नाही. आपला मोठेपणा मेलेल्याला मारण्यावरून सिद्ध होतो का? शिवाय, आपल्यातच एकी नाही असं म्हणायचं आणि आपल्याच लोकांशी भांडायचं हे तरी योग्य आहे का?"

थोडक्यात, मामांनी माझीच विकेट काढली होती.... त्याचबरोबर सभासदांची आणि त्यांची स्वतःचीही!

फोन ठेवण्याआधी मामा मला म्हणाले,

"मी विनीतमुळे इंग्लंडमध्ये असताना हे हॉरिबल हिस्टरीजचे कार्यक्रम बघू शकलो होतो आणि खूप हसूही हसलो होतो. तुझ्या वाक्यामुळे ते आठवलं… अलीकडे मीही लिहायला लागलोय - आपल्या इतिहासावर असंच काहीसं!"

- कुमार जावडेकर

Monday 1 February 2021

इतिहास्यटिका - माउंटबॅटन

(पडदा उघडतो. भिंतीवर 'यमसदन' अशी पाटी. मागे तीन दारं, त्यांच्यावर 'स्वर्ग', 'प्रतीक्षा' आणि 'नरक' अशा तीन पाट्या. स्वर्गाच्या दाराच्या डावीकडे आणि नरकाच्या दाराच्या उजवीकडे एक-एक खिडकीही आहे. तिला पडदे आहेत. या शिवाय डावीकडे आत यायचा दरवाजा आहे उजवीकडे आत जायचाही एक दरवाजा आहे. खोलीत एक टेबल, खुर्ची, टेबलावर पेपरवेटखाली ठेवलेला एक अर्धा उघडलेला कागद आणि शेजारी एक 'ब' लिहिलेली फाईल. टेबलावर एक संगणक, एक रिमोट आणि कोपऱ्यात टी. व्ही. आहे. या व्यतिरिक्त एक सोफा, अजून एक खुर्ची आणि एक अ ते ज्ञ पर्यंत फायली ठेवलेलं जुनाट उघडं शेल्फ. 
आत यायच्या दरवाज्यातून एक गृहस्थ प्रवेश करतात. जाडजूड. नखशिखान्त काळे कपडे. येताच प्रेक्षकांकडे बघून थबकतात. "शू:! " अशी गप्प बसण्याची खूण करतात. दबक्या पावलांनी जाऊन 'स्वर्ग' आणि 'नरक' या पाट्यांची अदलाबदल करतात. इकडे-तिकडे बघतात. पुनः प्रेक्षकांकडे बघून तोंडावर बोट ठेवतात. मग 'प्रतीक्षा' लिहिलेल्या दाराला कान लावतात. मान डोलावतात, स्वतःच हसतात आणि समोर येतात.)
गृहस्थ: नमस्कार. वास्तविक आपली 'प्रोसीजर'च आहे ही. मी उगाच तुम्हांला गंमत वाटावी म्हणून खुणा करत होतो. येईलच तुमच्या लक्षात थोड्या वेळात. आधी साहेब आले की नाही ते बघू. (पुढे वाकून, कान दिल्याची कृती - ) काय म्हणता? कोण साहेब? अहो, इथे दोन साहेब आहेत. कुणाबद्दल सांगू? तुमच्या पैकी कुणाला आहेत का दोन साहेब? - आहेत ना? (आवाज बदलून) मग काय, येते ना मजा? (डोक्यात प्रकाश पडून -)  पण आधी मी कोण, हे तर सांगतो. माझं नाव -
(तेवढ्यात डावीकडून आवाज येतो - "ए रेड्या". गृहस्थ खजील होतात. डावीकडून अजून एक मनुष्य येतो.)
गृहस्थः  साहेब, तुम्हांला किती वेळा सांगितलं, जरा चारचौघांत तरी मला "अहो रेडकर" म्हणा! मी म्हणतो ना तुम्हांला (नाटकी आवाजात) "मान्नीय यमदेव!"
यमदेवः पुरे! चल, आज बरीच कामं आहेत पृथ्वीवर.
रेडकरः (प्रेक्षकांना - ) कोणती ते तुमच्या लक्षात आलं असेलच. ('गळ्यावरून हात फिरवतो - सुरी फिरवण्याची / मरण्याची नक्कल. पण उघडपणे म्हणतो-) जमणार नाही. 
यमदेवः आलं ध्यानात. अहो श्रीयुत रेडकर! आपण प्रस्थान करायचं का?
रेडकर: (हंबरल्यासारखं) हम्म....जमणार नाही.
यमदेवः का?
रेडकरः चित्रगुप्त साहेबांचा आदेश आहे. ('प्रतीक्षा' लिहिलेल्या दाराकडे बोट दाखवून -) इथल्या एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला कमी केल्याशिवाय नवीन कुणाला भरती करायचं नाही! (प्रेक्षकांकडे बघून - ) आमच्याकडे इथे इतकी माणसं आहेत की या दालनाला 'प्रतीक्षागृह' न म्हणता 'प्रतीक्षानगर' म्हणायला लागेल. काय आहे, साधी माणसं सरळ स्वर्गात किंवा नरकात जातात. त्यांचा हिशोब जुळलेला असतो. पण अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मात्र फार तपासून पुढे पाठवायला लागतं बरं का.
यमदेवः हा चित्रगुप्त म्हणजे... 
रेडकरः अहो साहेब, थांबू की जरा. बघू की मजा.
यमदेवः पुरे रे तुझ्या गमजा... खाली कोविडमुळे किती काम वाढलंय माहिती आहे?
रेडकरः म्हणूनच सांगतो साहेब. इथे नवीन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जागा नाही. आधी रिकामी करा थोडी.
यमदेवः ठीक आहे. कुठे आहे तो चित्रगुप्त?
रेडकरः आत गेलेत. माणूस शोधतायत. 
यमदेवः बरं. कोणाचा नंबर लागतोय आज? (म्हणत टेबलाकडे जातात... पेपरवेटखालचा कागद उचलतात. ) माउंटबॅटन. छान. फाईल बघू. ('म' ची फाईल काढतात.)
रेडकरः आता माउंटबॅटन म्हणजे? 
यमदेवः 'माउंट' म्हणजे पर्वत आणि 'बॅटन'म्हणजे सांधा.
रेडकर:  म्हणजे गंमतीचा वांधा. माणूस चांगला निघणार... दुसरा पण अर्थ असेल की बघा एखादा.
यमदेवः तूच सांग. तू वेदशास्त्रसंपन्न आहेस.
रेडकरः (पुनः हंबरून) हम्म... तो संकृतमधला. ज्ञानेश्वर महाराजांनी (इथे डोळ्याला नमस्कार केल्यासारखे हात) इंग्रजी नाही शिकवली आपल्याला.
यमदेवः (प्रेक्षकांना -) बघा. एरवी त्याचं ज्ञान फाडत असतो. (रेडकरांना -) ठीक आहे, पुनः बघू. 'माउंट' म्हणे पर्वत. 'बॅटन' म्हणजे 'दुसऱ्यांच्या जिवावर स्वतःची प्रगती करणे'. 
रेडकरः म्हणजे, दुसऱ्यांच्या जिवावर स्वतः प्रगतीचे पर्वत चढून जाणे. ... (कळून स्वतः वर खूष होतो आणि हसतो. पुढे म्हणतो, थोडं स्वतःशी थोडं प्रेक्षकांशी) माउंटबॅटन...हे उंटावरचे शहाणे की पर्वतावरचे? 
यमदेव (दुर्लक्ष करत): अरे, पण फायलीत नाव सापडत नाहीये!
(तेवढ्यात चित्रगुप्त आणि माउंटबॅटन येतात.)
चित्रगुप्तः प्रतीक्षागृहातही सापडत नव्हते... तिथे 'म' च्या फायलीत नाही सापडणार नाव - या 'ब' मध्ये बघा. (टेबलावरच्या फाईलकडे बोट दाखवतात. ) जर्मन नावाचा बभ्रा होऊ नये म्हणून 'बॅटनबर्ग' चं 'माउंटबॅटन' केलं होतं ह्यांनी.
रेडकरः आता 'बॅटनबर्ग' म्हणजे...
यमदेव: अर्थ तोच होतो रेडकर. माणूसही तोच आहे. फक्त जर्मन शब्दांऐवजी इंग्रजी शब्द केले.
रेडकरः मग ठीक आहे.
चित्रगुप्तः ठीक काय आहे?
रेडकरः शब्दांची उलटापालट करूनही अर्थ बदलत नाही हे! नाही तर बघा ना, नुसत्या 'पर्वते'चं 'ते पर्व' केलं तरी अर्थ बदलतो की.
यमदेवः किंवा डीमेलोचं मेलोडी! 
(दोघे "पर्वते डीमेलो, ते पर्व मेलोडी" असं तीन-चार वेळा तालात म्हणतात.)
रेडकरः साखरदांडे, गायकवाड आणि इंगळहळ्ळीकर यांचं कसं होईल?
चित्रगुप्त (अडवून): थांबा, पुरे.
यमदेव: पण आडनाव बदललं कशाला?
चित्रगुप्तः अहो, मूळचे जर्मन वंशाचे हे. पण इंग्लंडच्या राज्यकर्त्यांपैकी. महायुद्ध सुरू झाल्यावर यांनी देश बदलण्याऐवजी आडनाव बदललं. 
यमदेव: असं झालं होय? आडनाव जाऊ दे. नाव काय ह्यांचं?
चित्रगुप्तः लुई फ्रान्सिस अल्बर्ट व्हिक्टर निकोलास.
रेडकर (मोजत): एक, दोन, तीन, चार, पाच... मग बाकीचे चार पांडव कुठे आहेत?
माउंटबॅटन (प्रथमच तोंड उघडतात): व्हॉट अ प्रिपॉस्टरस क्वेश्चन! ही सगळी माझीच नावं आहेत!
चित्रगुप्तः हे तर काहीच नाही. (फाईल चाळत... ) यांना मिळालेल्या उपाध्या अजून खूप आहेत. फर्स्ट अर्ल माउंटबॅटन ऑफ बर्मा, फर्स्ट सी लॉर्ड, व्हाइसरॉय ऑफ इंडिया, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ, लॉर्ड, .... 
(माउंटबॅटन प्रत्येक ठिकाणी आत्मप्रौढीनं माना डोलावतात.)
रेडकरः पण केलं काय यांनी जीवनात? 
यमदेव: त्यांनाच विचारुया की. त्याचसाठी आले आहेत ना ते इथे?
चित्रगुप्तः हो तर! विचारायचंय तर...
माउंटबॅटनः दुसऱ्या महायुद्धात मी रॉयल नेव्हीत होतो.
रेडकर: छान छान. आपल्या देशासाठी - म्हणजे इंग्लंडसाठी - युद्ध करत होतात.
माउंटबॅटनः हो. एच एम एस केली चा कमांडर होतो.
रेडकर: छान छान. 
चित्रगुप्तः पण त्या जहाजाला जर्मन टॉर्पीडोच्या तावडीत नेऊन सोडलं! 
यमराजः हो का? मग त्यानंतर?
माउंटबॅटनः केली दुरुस्तीला गेलं आणि मी एच एम एस जावलीन चा कमांडर झालो. 
चित्रगुप्तः आणि त्या जहाजालादेखील जर्मन टॉर्पीडोनी जर्जर केलं. 
रेडकर: अरे वा! कन्सिस्टंट...
चित्रगुप्तः मधल्या काळात एच एम एस केली दुरुस्त झालं होतं. त्याला त्यांनी ग्रीसला जर्मनांशी युद्ध करायला पाठवलं.
यमदेव: थांबा, आणि त्याला जर्मनांनी बुडवलं. बरोबर?
चित्रगुप्तः अगदी बरोबर!
रेडकर आणि यमदेव (हसून): अरे वा! कन्सिस्टंट... (यमदेव आणि रेडकर दोघेही चित्रगुप्तांना टाळ्या देऊ पाहतात. पण दोघे एकदम करायला गेल्यामुळे कुणाचीच टाळी वाजत नाही.) 
चित्रगुप्तः हो ना. मग त्यांना बढती मिळून ते व्हाइस ऍडमिरल झाले. 
रेडकरः चर्चिलचे चांगले मित्र होते ते. शिवाय राजघराण्यातलेही. पण या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध नसावा.
यमदेवः मध्ये मध्ये बोलू नका रेडकर!
चित्रगुप्तः या नंतर त्यांनी ऑपरेशन ज्युबिली हाती घेतलं. कॅनडाच्या सुमारे पाच हजार सैनिकांना (आणि ब्रिटनच्या एक हजार सैनिकांना) एका फ्रेंच बंदरावर सोडलं.  त्यांपैकी ६८% मारले गेले.
माउंटबॅटनः पण त्याच अनुभवातून आम्ही पुढे नॉर्मंडीची लढाई करू शकलो. 
चित्रगुप्तः असं तुम्हीच म्हणालात! 
यमदेवः पण त्या अनुभवाची गरज होती का?
चित्रगुप्तः या पुढे त्यांनी काय केलं हे आपण त्यांनाच विचारुया.
माउंटबॅटनः मग आम्ही नॉर्मंडीपर्यंत पाण्याखालून तेलाचे पाईप टाकले.
चित्रगुप्तः पण नॉर्मंडीच्या लढाईत त्या तेलाचा वापरच झाला नाही!
रेडकर: छान! म्हणजे ती पाइपलाइन इतके वर्षं नुसतीच भिजत पडली आहे...
यमदेव: भिजत नाही, कुजत... इंग्लिश खाडीत आहे ना ती! 
माउंटबॅटनः पण मग ब्रह्मदेशातली लढाई आणि मुख्य म्हणजे शेवटी महायुद्ध कोण जिंकलं?
चित्रगुप्तः ब्रह्मदेशातली लढाई तुम्ही आणि महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी.
माउंटबॅटनः म्हणजे आम्हीच की. 
चित्रगुप्तः युरोपातली तुमच्याशिवाय.
माउंटबॅटनः हे खरं नाही. तुमच्या नोंदी चुकीच्या आहेत. असंच जर चालू राहिलं तर तुम्ही मला नक्कीच नरकात पाठवाल... वास्तविक माझ्यामुळे भारताला स्वातंत्र्य...
यमदेवः या यमसदनात कोणावरच अन्याय होत नाही. ती माझी जबाबदारी आहे. चित्रगुप्ता, चल लवकर जमाखर्च सांग. रेडकर, आपण गप्प बसायचं.
चित्रगुप्त (आपल्या खुर्चीत बसतात.) 
आवक - भारताला स्वातंत्र्य दिलं. जावक - भारताची फाळणी केली.
आवक - स्वातंत्र्य वेळेआधी दिलं (जून १९४८ ची मुदत ठरली होती). जावक - स्वातंत्र्य देण्याची घाई केली (१५ ऑगस्ट १९४७ ला), नकाशेही आखण्याआधी फाळणी केली. 
आवक - काश्मिरच्या सामिलीकरणावर सही केली. जावक - काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याचा सल्ला दिला.
आवक - ब्रिटिश राजघराण्याचे नातेवाईक आणि प्रेमळ सल्लागार. जावक - ब्रिटिश लोकशाही उलथून स्वतःकडे सत्ता घ्यायचा प्रयत्न.
यमदेवः काय म्हणता?
रेडकरः शेवट कसा झाला त्यांचा?
माउंटबॅटन: आठवत नाही तुम्हांला? आय. आर. ए. ने मारलं.
रेडकरः म्हणजे इंडियन रिपब्लिकन आर्मी?
यमदेवः हट. आयरिश रिपब्लिकन आर्मी.
चित्रगुप्तः आहे इथे. आवक - हुतात्मा झाले शेवटी. जावक - काही नाही.
यमदेवः म्हणजे?
चित्रगुप्तः निवडा माउंटबॅटन. कुठे जायचंय तुम्हांला? स्वर्ग की नरक?
रेडकरः थांबा. यांच्या हायलाइटस नाही बघितल्या आपण टी. व्ही. वर...
चित्रगुप्तः (रेडकरांना -) ते शक्य नाहीये. सेन्सॉर बोर्डानं सगळ्या चित्रफिती ठेवून घेतल्या आहेत. हं... माउंटबॅटन, सांगा, कुठे जाणार तुम्ही?
(माउंटबॅटन स्वर्गाचं दार उघडून पलीकडे जातात. रेडकर शांतपणे त्यांच्यामागून जातात, 'स्वर्ग' आणि 'नरक' या पाट्या आपल्या मूळ जागांवर लावून टाकतात...पडदा पडतो.)

- कुमार जावडेकर

Sunday 27 December 2020

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि शेर

"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,

"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."

"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.

वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत. त्यामुळे त्याला 'सामाजिक दूरता' ('सोशल डिस्टन्सिंग') असं नाव कुणी देणार असेल तर देवोत, आमच्या समजात मात्र दूरता नाहीये. फक्त आम्ही कुठलाही नवीन व्याप किंवा उपद्व्याप मांडला की त्याचं रूपांतर ताप किंवा पश्चात्ताप यांत होतं (हे पूर्वीच्या 'कॅस'* किंवा 'व्हॅलेंटाईन डे'*च्या अनुभवांवरून आम्हांला चांगलंच कळून चुकलंय).  कारण कधी कधी इतरांपासूनच आमची 'सामायिक दूरता' मात्र झालेली असते. म्हणूनच मामा या वेळेला काही करण्याआधी माझा सल्ला विचारत होते. 

माझ्या मते सगळेजण आपापल्या घरी बसून जे हवं ते खातायत (शिवाय गरजेनुसार पितायत) ही गोष्ट पुरेशी समाधानकारक होती. नाही तर, पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'यांच्यासारखा गोंधळ राजकारणीदेखील घालू शकत नाहीत' अशी आमच्याकडे परिस्थिती असते - अगदी दर वर्षी.

प्रथम मामा पार्टीचा प्रस्ताव आणतात. ती कोणत्या दिवशी करायची हा पहिला प्रश्न असतो. २४ डिसेंबर ते १ जानेवारी यातल्या प्रत्येक दिवसावरून चर्चा (आणि मतभेद) होतात. एक तर गुड फ्रायडे-ईस्टर संडे/मंडेंसारखा ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा वार कुणी  पक्का केलेला नाही.  ती तारीख आठवड्यात कुठेही भरकटलेली असते आणि अनेकांच्या सोयीची नसते. ३१ तारखेच्या आपापल्या पार्ट्या प्रत्येकानं ठरवलेल्या असतात त्यामुळे तो दिवस रद्द होतो. एक तारखेला सगळ्यांना सुट्टी नसते. ज्यांना असते त्यांच्यातल्या काहींना आदल्या रात्रीच्या हँग-ओव्हरची चिंता असते. काहींनी एक तारखेपासून आपण अपेय-पान सोडणार असा एक संकल्प सोडलेला असतो. अर्थात, 'संकल्प' या शब्दालाच 'सोडणे' हे क्रियापद जोडलं गेलं असल्यामुळे त्यांना पुढच्या एक-दोन दिवसांतच अपेय-पान सोडणे  किंवा सोडलेला संकल्प सोडणे असे त्यातून दोन विकल्प सापडतात!

पार्टी सोसायटीपुढच्या अंगणात करायची की गच्चीवर हा मुद्दा मग चर्चिला जातो.  २०१८ च्या संपण्याच्या वेळी अंगणात झालेल्या पार्टीत 'मान ना मान, मै तेरा सलमान' असं म्हणत शर्मानं आपला टी-शर्ट फेकून देऊन नाच केला होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीची मेहमाननवाजी ओढवून आणली होती. सुदैवानं त्यांनी ते फक्त बघण्यावारीच नेलं होतं. त्यामुळे शर्माला झाकण्यासाठी गच्चीचे कठडे तरी कामी येतील असं वाटून मग गेल्या वर्षीची पार्टी गच्चीत करण्यात आली होती.  त्यानं तिथे गच्चीच्या कठड्यावर उभं राहून 'टायटॅनिक'चा सीन करायची कल्पना आमच्यासमोर मांडून वात आणला होता. अर्थात, आधीच पुरेशी चढलेल्या शर्माला तितपत चढणंही अशक्य झालं असतं. पण तरी तो धोका न पत्करता आम्ही गच्चीत बऱ्यांच दिवसांपासून पडलेली एक वेताची खुर्ची त्याच्यासमोर आयत्या वेळी सारली होती.  तो आणि सौ. शर्मा तिच्यावर टायटॅनिक पोज मध्ये उभे राहताच त्या खुर्चीचंच टायटॅनिक झालं होतं!

पार्टीतले गेम्स हा पुढचा मुद्दा येतो. भुजबळांचे पार्टी गेम्स हे आमच्या पार्ट्यांचं आकर्षण असतं. (निदान असा त्यांचा समज आहे.) त्यांना डोळ्यांना पट्टी लावणं (इतरांच्या) या गोष्टीचं अत्यंत अप्रूप आहे. त्यात (मुलांनी) गाढवाला शेपटी लावण्यापासून ते (मोठ्यांनी) ऐश्वर्याला बिंदी (किंवा अभिषेकला शेंडी) लावण्यापर्यंत सगळे सोपस्कार होतात. जसं वर्ष पालटतं, तसे गाढवाच्या ऐवजी हत्ती/घोडे आणि ऐश्वर्या/अभिषेकच्या ऐवजी दीपिका/रणवीर वगैरे येतात एवढाच काय तो बदल. 

उमा मुलांचा नाच बसवते, काही मुलं गाणी म्हणतात. मीही कुणी तरी फर्माइश केल्याचं निमित्त करून एखादी गझल म्हणतो.

मामांची रॅफल तिकिटं, त्यातून जिंकलेली बक्षिसं (जी मला कधीच मिळत नाहीत), त्यानंतर बरोब्बर बारा वाजता त्यांचं सँटाक्लॉज होऊन येणं आणि मुलांना भेटवस्तू देणं, रॅफलचे उरलेले पैसे आपण कुठल्या संस्थेला देणार आहोत त्याची वाच्यता करणं हे बाकीचे नित्याचे कार्यक्रम होतातच.

मेनूवर मात्र पूर्वीच तोडगा निघालेला आहे. दिवाळीला साग्रसंगीत भारतीय जेवण तर नवीन-वर्षाला पाश्चात्य. त्यात पिझ्झ्याबरोबर बर्गर्स, शिवाय त्याआधी "कुछ तो स्पायसी स्नेक्स चाहिये" या दोशीच्या मागणीवरून समोसे (मग मराठी पदार्थ का नकोत म्हणून भुजबळांच्या इच्छेप्रमाणे बटाटेवडे), अगदीच कुणाची संकष्टी निघाली तर त्यानं कष्टी होऊन नये म्हणून साबुदाणे वडे (आणि बर्गरसोबत आलेल्या फ्रेंच फ्राईज) असतात.  आता इतके सगळे पदार्थ आहेतच तर शेवटी भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटत नाही म्हणून मी, परुळेकर मामा-मामी त्या यादीत पुलाव घुसवतो. ब्लॅक फॉरेस्ट केक आणि  त्याच जोडीला 'वॅनिला आईसक्रीम और गुलाबजामून का काँबिनेशन होना चाहिये' म्हणून तेही समाविष्ट झालेले असतात... 

आता या सगळ्यांत परिस्थितीजन्य बदलांपेक्षा अन्य काही करणं मला अवघड वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी मी पुनः बाल्कनीत आलो. मामांना म्हटलं,

"एक सकारात्मक गोष्ट सांगायची आहे. ती आपल्या पार्टीत चालेल का बघा. "

"म्हणजे ही कल्पना आवडली तर तुम्हांला. "

"थांबा, आधी गोष्ट तर ऐका, " मी सुरुवात केली, "अलीकडेच एक बातमी वाचली - 'हत्तीच्या सुटकेला 'शेर' धावून'...

"हो, वाचली आहे मी ती."

"सकारात्मक आहे की नाही? "

"प्रश्नच... "

मी मामांना मध्येच अडवत म्हटलं,

"थांबा. विचार करा. पाकिस्तानातल्या एकाकी हत्तीच्या सुटकेसाठी 'शेर' नावाची एक पॉप गायिका धावून आली. तिच्या मदतीनं त्या हत्तीला विमानात घालून कंबोडियात नेण्यात आलं. आता तिथे त्याला तीन हत्तिणी सांगून आल्या आहेत. अशी ती पूर्ण बातमी आहे." (https://www.bbc.co.uk/news/av/55122863)

मामा हसले,

"खरं आहे. वास्तविक तो हत्ती पाकिस्तानातला. म्हणजे भारतीय वंशाचाच असणार. मग त्याला भारतातलंच स्थळ का नाही बघितलं? इथे काय हत्ती नाहीत का?"

"नाही तर काय? शिवाय विमानानं पाठवायची काय गरज होती? भारतात तो चालत चालतही येऊ शकला असता. "

"पण तो आला नाही तेच बरंय. त्याला बाटवून त्यांनी हेर केला नसेल कशावरून? "

"आता असं केलं पाहिजे. निदान त्या कंबोडियातल्या अंकोर वाट मध्ये शुद्धीकरण करून त्याची चांगली मुंज लावली पाहिजे आधी. "

दोघेही हसलो. मामा म्हणाले,

"छे. छे. ही बातमी अजिबात सकारात्मक किंवा आनंददायी नाहीये."

"ठीक आहे. तुम्हांला दुसरी एक बातमी दाखवतो," मी म्हटलं.

'महाराष्ट्रातला एक एकटा वाघ तीन हजार किलोमीटर चालून शेवटी महाराष्ट्रातल्याच दुसऱ्या अभयारण्यात पोचला' अशी ती बातमी होती.  (https://www.bbc.co.uk/news/world-asia-india-54973452)

"यात काय सकारात्मक किंवा आनंददायी आहे? "

"राष्ट्रच काय पण महाराष्ट्रदेखील सोडला नाही त्यानं. बायको करीन तर आपल्याच जातीची."

"खरं आहे. वाघाची नरभक्षक म्हणून ओळख होती, संस्कृतीरक्षक म्हणून आजच झाली. अगदी शिवसेना किंवा म. न. सेना यांच्या वाघांना जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं."

मामांनी लवकरच पार्टीची घोषणा केली. त्यात भुजबळांनी एक 'व्हर्च्युअल क्विज' घेतलं. उमानं 'झूम'वर मुलांचा एक 'सिंक्रोनाईज्ड डान्स' करवून दाखवला. शर्मा फक्त "इस बार वो मजा कहां' असं बार बार म्हणून घेत होता. (त्याचा फोन मात्र मधेमधे 'म्यूट' वर जात होता आणि कॅमेरा बंद पडत होता. )

मधल्या गप्पांमध्ये कोविडवरची लस, ब्रेक्झिट, शेतकरी, सर्वबाद छत्तीस असे अनेक विषयही चघळले गेले.

निरोप घेताना आम्ही एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

"आपण उगाचच आपल्या आवडीनिवडी जगावर थोपवायला बघतो. आहे ते उत्तमच आहे. " मामा दुसऱ्या दिवशी मला म्हणाले.

- कुमार जावडेकर

(* ह्या कथा अनुक्रमे 'लोकसत्ता - हास्यरंग पुरवणी सप्टेंबर २००३' आणि माझ्या 'निवडक अ-पुलं' या इ-पुस्तकात पूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत.)

Tuesday 22 December 2020

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या.

आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.)

असं अनेकदा होतं. काही गाणी आपण रेडिओ, टीव्ही, सीडी. इ. माध्यमांतून पुनः पुन्हा ऐकतो, पुनर्प्रत्ययाच्या आनंदासाठी. काही गाणी तर इतकी लवकरच का संपून जातात असंही वाटतं. 'नखरेवाली' या गाण्यात किशोर कुमारला अजून एक तरी कडवं का नाही इथपासून 'किरवाणी' या रागातली गीतं कितीही ऐकली तरी अधुरीच का वाटतात (आणि मनात तो राग रेंगाळतच का राहतो) असे प्रश्न मला वारंवार पडत आले आहेत.

याउलट काही गाणी रेडिओ, टीव्ही, कॅसेट, सीडी, मोबाईल, युट्यूब कुठूनही ऐकू आली की आपल्याकडून त्यांना बदलणं किंवा बंद करणं या क्रिया घडवण्यासाठीच तयार केली जातात का?

कधी कधी मला असं वाटतं की रसग्रहणाचेही कदाचित तीन प्रकार असावेत. 

पहिलं साधं-सोपं रसग्रहण. उसाचा रस पिण्यासारखं. निव्वळ आनंद. कितीही वेळा घ्यावा. आपली भूमिका फक्त घेणाऱ्याची.

दुसरं रसग्रहण म्हणजे, गाणं चवीनं ऐकणं किंवा पुस्तक चवीनं वाचणंच; पण त्याबरोबरच त्यातली सौंदर्यस्थळं जाणून घेऊन. त्या रागांच्या, कवितांच्या किंवा नाटकांमधल्या संवादांतल्या खुब्या लक्षात घेऊन केलेलं. बालगंधर्वांनी भीमपलासमध्ये लावलेल्या शुद्ध निषादासारखं. (अर्थात, या गोष्टीचा विषाद वाटणारेही काही महाभाग होतेच.)

तिसरा 'रसग्रहणा'चा अर्थ - रसाला लागलेलं ग्रहण - असा असेल का?... असा प्रश्न मला अनेक वेळा पडतो. (आता अर्थात, प्रश्न पडतो हे म्हणणं मला खरं तर पटत नाही. तो तर उभा असतो... 'खडा सवाल' म्हणून आणि आपल्याला टोचत असतो, आपल्या विचारधारेत - की रसात - खडा आल्यासारखा.) या रसग्रहणात 'चंद्रग्रहण' म्हणजे चंद्राला लागलेलं ग्रहण, सूर्यग्रहण म्हणजे 'सूर्याला लागलेलं ग्रहण'; त्याचप्रमाणे 'रसग्रहण' म्हणजे रसाला लागलेलं ग्रहण असं अभिप्रेत आहे.

असो. रसग्रहण कुठलंही असो, विषय गोड असला म्हणजे झालं. पेरू खाणाऱ्याला बियांचं वावडं नसावं.

अन्नू मलिकबद्दलचं रसग्रहण हे दुसऱ्या प्रकारातलंच आहे हे तरीही मला सुरुवातीलाच (म्हणजे नमनाला घडाभर तेल झाल्यावर) नम्रपणे, नमून, नमूद करावंसं वाटतं.

"अन्नू मलिक यांच्याबद्दल मला एक चांगली गोष्ट सांगायची आहे, " एका कार्यक्रमात एक निवेदक म्हणाला होता, "की ते सरदार मलिकांचे चिरंजीव आहेत." या वाक्यावर सगळे श्रोते हसले आणि चिरंजीव अन्नूला असं 'विरासती' मधून चांगल्या संगीताचा वारसा मिळाला असला  तरी त्याचं संगीत कसं चिरंजीव नाही याची त्यांना जाणीव झाली. वास्तविक, 'सारंगा तेरी याद में' हा एक रंग सोडला तर मला तरी सरदारांचे इतर रंग काही फारसे याद किंवा ज्ञात नाहीयेत. अन्नूचे मात्र अनेक राग-रंग बघितले आहेत. पण काय आहे, जुन्या लोकांसारखा अन्नू मलिकला कुणी वाली (किंवा राममित्र सुग्रीव) नसल्यामुळे कुणीही माकडं त्याची चेष्टा करू शकतात. वास्तविक हिंदीत 'चेष्टा' म्हणजे 'प्रयत्न'. तशी संगीताची चेष्टा अन्नू मलिकनं खूपच केलेली आहे, याबद्दल कुणाचं दुमत नसावं!

'एखादी गोष्ट पडणे म्हणजे त्याचा अण्णू गोगट्या होणे' हे जसं पु.ल. 'अंतू बर्वा'त म्हणून गेले होते, तसाच काहीसा समज माझा अन्नू मलिकबद्दल झाला होता. ‘एखादे गाणे न आवडणे म्हणजे ते अन्नू मलिकचे संगीत असणे' असं मला अनेक दिवस वाटत आलं होतं.

'त्यासाठी रसिकता म्हणजे काय हे तुम्हांला आधी कळलं पाहिजे' असं माझे एक विद्वान मित्र म्हणाले. मी त्यांना पु. लं. च्या 'गाठोड्या'तली सामंतांच्या घरची मासे खाण्याची 'रसिकता' सांगण्याचा मोह आवरला. आता त्यांच्यासारखं (म्हणजे आमच्या मित्रवर्यांसारखं - सामंत वैनींच्या बांगड्याच्या आमटीसारखं नाही -) रसग्रहण जर मी करायला लागलो तर माझी काही खैर नाही.

"१९६० नंतर संगीत संपलं." (वास्तविक आमच्या मित्रांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता.) "शास्त्रीय संगीतात फक्त आमिर खान आणि बडे गुलाम अली खान, तर चित्रपट संगीतात नौशाद, सज्जाद आणि सुरुवातीचा मदन मोहन यांपलीकडे काही दम नाहीये", असा त्यांनी एकदा मला सज्जड दम भरला होता. (आता सज्जादचा नौशादवर फार राग होता हे त्यांना माहिती होतं की नव्हतं याची शहानिशा मी न करता फक्त त्यांच्यासमोर 'ये हवा ये रात ये चांदनी' हे माझं सर्वांत आवडतं गाणं आहे अशी कबुली दिली होती.)

सज्जादचं जाऊ द्या; पण नौशाद किंवा शमशादवरसुद्धा लिहिण्याची कुणाची बिशाद आहे? शिवाय, जुन्या कुठल्याही विषयावर काही लिहायचं म्हणजे हे मित्र सोडून अनेक इतर व्यक्ती-प्रकृतींनाही सामोरं जावं लागतं. म्हणून आमचा बिचारा अन्नू बरा. आता साधी गोष्ट घ्या. 'बैजू-बावरा'तलं प्रत्येक गाणं (आमिर खान यांच्या गाण्यांचा अपवाद वगळता) 'हो जी हो' नं सुरू होतं. म्हणून आम्ही ते संगीत चांगलं या म्हणण्याशी 'हो ला हो' करतो. 'बचपन की मुहब्बत को' आळवतो. पण अन्नूच्या 'बाली उमर ने मेरा हाल वो किया' ला नावं ठेवतो. वास्तविक दोन्ही चित्रपटांच्या गीतांमध्ये लता मंगेशकर आहे. आता बैजूमधल्या बावऱ्या महंमद रफी ऐवजी इथे अजीजीनं गायलेल्या महंमद अजीजचाच काय तो फरक.

याखेरीज, अगदी बडे गुलाम अली खान किंवा आमिर खान नसले तरी गुलाम अलीच्या आवाजात त्याच चित्रपटात गीत ध्वनिमुद्रित करूनही अन्नू 'चमकता चांद' होण्याऐवजी 'आवारगी'च 'टूटा हुआ तारा' ठरला. हीच त्याची गत पुढे (चालू काळातल्या) आमिर खानला घेऊन केलेल्या 'अकेले हम, अकेले तुम' नं केली. आमिर खान हा एक अयशस्वी संगीतकार असतो अशी ती कथा होती आणि अन्नू(अण्णू)नं ती, अत्यंत सहजपणे, अत्यंत यशस्वीरित्या सादर केली होती.

'१९४२-अ लव्ह स्टोरी' च्या काळात आर. डी. बर्मनचं निधन झालं आणि पुढच्या 'करीब' या चित्रपटासाठी विधुविनोद चोप्रांनी अन्नूला जवळ केलं. त्याची गाणी लोकप्रिय झाली असतील, पण नवीन आर. डी. सापडला असं कुणी म्हटलेलं अन्नूच्या नशिबात काही आलं नाही. 'बॉर्डर'नं सोनू निगमचा उदय झाला आहे हा संदेसा दिला, तर 'रेफ्युजी'नं जावेद अख्तरच्या शब्दांनाच जास्त भाव दिला. 'अशोका'च्या संगीताची त्याच सुमारास आलेल्या 'लगान' मार्फत रहमाननं विकेट काढली आणि 'उमराव जान' ऐकताना लोकांना नवीन अन्नू स्मरणात राहण्यापेक्षा जुना खय्यामच आठवत राहिला.

अन्नूनं तरीही आपल्या अख्ख्या कारकीर्दीत कधी डगमगण्यात किंवा हिरमुसण्यात वेळ घालवला नाही. 'बाजीगर' नंतर आपला पथच नाही, तर आपला 'विजयपथ' कोणता आहे हे त्यानं 'राहों मे उन से मुलाकात हो गयी' म्हणत स्पष्ट केलं. आधीच्या 'सोनी महिवाल' किंवा 'मर्द'वर लक्ष्मीकांत-प्यारेलालचा प्रभाव असेल, पण आता चलती असलेल्या नदीम-श्रवणच्या संगीत-संयोजनाशीही आपण कशी सलगी करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. पुढे नदीम-श्रवण आटपले/आपटले, पण अन्नू 'फिर तेरी कहानी याद आयी', 'सोल्जर', 'बादशहा', 'डुप्लिकेट', 'सर' पासून 'मुन्नाभाई एम. बी. बी. एस.', 'मै हूं ना' पर्यंत लोकप्रियच होत राहिला आणि आपलं संगीत-संयोजनही काळाप्रमाणे बदलत राहिला.

'मास अपील' मिळालं; त्याला फक्त साधलं नाही ते 'क्लास अपील'. अर्थात, त्या मोहातही तो पुढे कधी पडला असेल असं वाटत नाही. आपलं संगीत 'उरलो उपकारापुरता' या भावनेनं 'दम लगाके हैश्शा' करत तो ढकलत बसला आणि 'चमत्कार' झाला! (हा १९९२ मधला 'प्यार हो जाएगा' हे गीत असलेला त्याच्या उमेदवारीच्या काळातला 'चमत्कार' नव्हता.) 'मोह मोह के धागे' हे गीत त्यानं संगीतबद्ध केलं आणि कधी नव्हे ते अन्नू मलिकला अनुल्लेखानं मारणारेच त्याचं गुणगान गाऊ लागले.

'सम्हाला है मैने बहोत अपने दिल को, जुबांपर तेरा फिर भी नाम आ रहा है' ही अन्नूची ओळ आळवायची पाळी आता त्या बिचाऱ्यांवर आलेली होती!

'रास्ते आस्ते चल जरा' एवढंच अन्नू यानंतर त्यांना म्हणाला, मनातही आणि जनातही. त्यानं आपलं धोरणही चालूच ठेवलं - 'बत्ती गुल, मीटर चालू.'

- कुमार जावडेकर

Wednesday 30 September 2020

सूर आकारले तुझ्यामुळे...

पं. यशवंत देव यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शिकलो होतो, ते मी शब्दांत बांधलं होतं. या शब्दप्रधान देवाला त्याच्याबद्दलच्याच शब्दांत श्रद्धांजली...

http://www.manogat.com/node/8323

(I had written this article in 2006, on his birthday, 2nd November)….

'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक श्री. यशवंत देव यांचा आज ८० वा वाढदिवस...

त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देव-सरांच्या मार्गदर्शनाखाली 'शारदा संगीत विद्यालय' (वांद्रे) इथे शब्दप्रधान गायकीमधे पदविकेचा अभ्यासक्रम चालवला जातो. त्यांच्याकडून तिथे ज्या गोष्टी शिकलो, त्याच मी शब्दांत बांधायचा प्रयत्न केलाय.... (यात कुठेही उपमा वगैरे नाहीत. शांता शेळके यांनी 'गुरु ईश्वर, तात, माय' म्हटलंय... यापुढे अजून काय उपमा देणार?). एकदा देव सर म्हणाले होते, मी चाल कवितेतूनच शोधतो, निराळी चाल बांधत नाही. त्यांनी शिकवल्याप्रमाणे, त्यांच्या शिकवण्यातूनच मला हे गीत सुचलंय... 

सूर आकारले तुझ्यामुळे...

गीत साकारले तुझ्यामुळे... 

[गाणं गाण्यासाठी आधी तोंड उघडा, जबडा खाली करा, तोंडाचा 'पॅराबोला' सारखा आकार झाला पाहिजे इ. गोष्टी ते नेहमी सांगतात आणि त्याची प्रात्यक्षिकं करून दाखवतात. त्यामुळे 'सूर 'आ'कारले...]

काल जे अंतरात राहिले,

आज ते सर्व मुक्त जाहले!

श्वास हुंकारले तुझ्यामुळे...

[गाणं येण्यासाठी श्वासानुसंधान महत्त्वाचं. 'श्वसनैवाधिकारस्ते मा स्वरेषु कदाचन' असं त्यांनी लिहिलं आहे. सूर हा श्वासांतून निर्माण व्हावा. म्हणून  श्वास हुंकारले ...]

हास्य ओठांत या फुलायचे

भाव गाण्यातले खुलायचे!

शब्द झंकारले तुझ्यामुळे...

[गाण्याआधी हसायला शिका... हे त्यांचं नेहमीचं वाक्य. हसलं की गाणं खुलतं हा आम्हांला सगळ्यांनाच अनुभव यायचा. त्यातूनच शब्द झंकारले ...]

गोड गाती अनेक कोकिळा

सूर माझा तयांत वेगळा!

स्वत्व स्वीकारले तुझ्यामुळे...

['अनुकरण' आणि 'अनुसरण' यांत फरक आहे. लता मंगेशकरांचा गळा तो त्यांचा आवाज, तुम्ही तुमच्या आवाजातच गा, असं ते नेहमी सांगतात. यामुळेच स्वत्व स्वीकारले ...]

- कुमार जावडेकर

Sunday 27 September 2020

प्रतिभा

मी तुझ्या रोज भोवती असते
एक अदृश्य सोबती असते

मी कधी रिक्त शाश्वती असते...
वा कधी दिव्य आरती असते!

आसवांचे जुनेच लोलक, पण-
मी नवी रंगसंगती असते

सांजवेळी तुझा विसावा मी
आणि दिवसा तुझी गती असते

तू करू पाहतोस जे त्याची
फक्त मी मूक संमती असते

- कुमार जावडेकर

Saturday 5 September 2020

नवल

सांग का सारे अचानक नवल भासू लागले?
सत्यही स्वप्नाप्रमाणे तरल भासू लागले...

कळत-नकळत होत गेल्या नजरभेटी जसजशा...
शांत मन इतके कसे चल-बिचल भासू लागले

मुग्ध डोळ्यांनी सुचवली उत्तरे जेव्हा मला
अंतरीचे प्रश्न सारे गझल भासू लागले

वेड जडले, अंतरे बेचैन झाली, हे खरे
मात्र हेतू सर्व अपुले सफल भासू लागले

नेहमीची वाट ही अन् खाच-खळगेही जुने
साथ क्रमता आज सारे प्रतल भासू लागले

लाभले ते देत गेलो मी जगाला, शेवटी-
एकले आयुष्य माझे सकल भासू लागले

- कुमार जावडेकर